विविध मागण्यांसाठी केडीएमसी मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण
कल्याण – महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ बेळ्ळेनवरु यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ अतिक शेख, सलाम शेख, सागर पाहाडी यांच्यासह महिला कार्यकर्त्याही उपोषणात सहभागी झाल्या आहेत.
उपोषणाचे मुख्य मुद्दे
राजाभाऊ बेळ्ळेनवरु यांनी सांगितले की, दलित, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पुनर्वसनासाठी कायदेशीर तरतुदी असूनही, त्यांची अंमलबजावणी होत नाही. कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरातील माता रमाबाई नगर येथे राहत असलेल्या नागरिकांना गटारे, पाणी आणि मोफत घरे यांसारख्या मूलभूत नागरी सुविधा आजवर महापालिकेकडून पुरवण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
तसेच, एका रस्ते विकास प्रकल्पामध्ये त्यांची घरे बाधित होत असल्यामुळे त्यांना पर्यायी घरे देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
फेरीवाल्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांच्या संदर्भातही उच्च न्यायालयाने व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेले असूनही, महापालिका प्रशासनाने त्याची अंमलबजावणी न केल्याचा आरोप त्यांनी केला.
राजाभाऊ बेळ्ळेनवरु यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत त्यांचे प्रश्न निकाली लागत नाहीत, तोपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरूच राहील.